शंकराचार्यांनी हिंदू धर्माला नवजीवन दिले   

डॉ. शंकर अभ्यंकर यांचे मत 

पुणे : आदि शंकराचार्यांनी केवळ तत्त्वज्ञानच नव्हे, तर हिंदू धर्माच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक पुनर्रचनेत मोलाचे योगदान दिले आहे. शंकराचार्यांनी आपल्या अल्पायुष्यात हिंदू धर्माला नवजीवन दिले. त्यांचे तत्त्वज्ञान अद्वैत वेदान्तावर आधारित आहे. शंकराचार्य यांचे तत्त्वज्ञान अलौकीक असून त्यांचा साहित्य, मठ आणि तत्त्वज्ञानाचा प्रभाव देशभरात पसरलेला आहे, असे मत डॉ. शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केले. वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित‘वसंत व्याख्यानमाले’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्रात ‘आदि शंकराचार्य-चरित्र व तत्त्वज्ञान’ या विषयावर   डॉ. शंकर अभ्यंकर बोलत होते. 
 
डॉ. अभ्यंकर म्हणाले, शंकराचार्यांचे जीवन आणि कार्य आजच्या तरुण पिढीला विवेक, वैराग्य आणि सत्याच्या शोधासाठी प्ररेणा देणारे आहे. आदी शंकराचार्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाला जागतिक स्तरावर पोहोचवले. त्यांचा वारसा पिढ्यानपिढ्या मार्गदर्शन करीत राहील. शंकराचार्यांचे जीवन आणि त्यांचा वारसा आजही भारतीय संस्कृतीत जिवंत आहे. त्यांनी कर्मकांड, भक्ती आणि ज्ञानमार्ग यांचा सन्मवय साधून हिंदू धर्माला नवसंजीवनी दिली. 
 
शंकराचार्यांनी वयाच्या आठव्या वर्षीच संन्यास स्वीकारला होता. गुरु गोविंदपाद यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाने त्यांनी वेद, उपनिषदे आणि शास्त्रांचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर संपूर्ण भारताचा प्रवास करत हिंदू धर्माचे एक प्रचारक म्हणून त्यांनी कार्य केले. त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानांनी देश एकत्र बांधला. त्यांच्या विचार, साहित्य आणि तत्त्वज्ञानाचा आपण अभ्यास केला पाहिजे, असेही यावेळी अभ्यंकर यांनी नमूद केले.
 
वक्तृत्वोत्तेजक सभेच्या ‘वसंत व्याख्यानमाले’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सव सुरु आहे. हा ज्ञानस्तंभ आजही ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. अनेक दिग्गज ज्ञानवंतानी येथे व्याख्यान दिले आहे. समाज प्रबोधनाबरोबरच राष्ट्र प्रबळ व्हावे म्हणून हे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. ही परंपरा अलौकीक असल्याचे यावेळी यांनी सांगितले. वक्तृत्वोत्तेजक सभेच्या कार्यकारिणीचे सदस्य स्वप्निल पोरे यांनी डॉ. शंकर अभ्यंकर यांचा सत्कार केला. प्रस्ताविकव सूत्रसंचालन संपदा लोहगावकर यांनी केले. 

हिंदू धर्माला एकसंध ठेवण्यात मोलाची भूमिका 

शंकराचार्यांनी उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रांवर लिहिलेली भाष्ये आजही तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांनी हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी आणि प्रचारासाठी देशाच्या चार कोपर्‍यात मठ स्थापन केले आहेत. द्वारकेत शारदा पीठ, बद्रीनाथ येथे ज्योर्तिमठ, पुरी येथे गोवर्धन पीठ आणि कर्नाटकात श्रृंगेरी पीठ, या मठांनी हिंदू धर्माला एकसंध ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली असल्याचे यावेळी अभ्यंकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, शंकराचार्यांचे तत्त्वज्ञान ‘ब्रह्म सत्यं, जगत् मिथ्या’ या सूत्रावर आधारित आहे. त्यांच्या मते ब्रह्म हेच एकमेव सत्य असून, विश्व हे मायेमुळे निर्माण झाल्याचा भास आहे, जीव आणि ब्रह्म यांच्या मूलतः एकत्व आहे. जीव आणि ब्रह्म यांच्यात मूलतः एकत्व आहे, हे आत्मज्ञानाद्वारे समजते असे शंकराचार्यांनी सांगितले, असल्याचे यावेळी अभ्यंकर यांनी नमूद केले.
 

Related Articles